आवंढा गिळावासा वाटणारा कोणताही प्रसंग... दगडी चेहर्याच्या आणि रापलेल्या बुद्धीच्या सोबतीला एक टचकन् हळवं होणारं मन नावाचं अकरावं इंद्रीय आहे याची सादर आठवण करून देणारी कोणतीही रात्र... बर्याच दिवसात आपण आपले होऊन राहिलो नाही असं वाटायला लावणारा कोणताही क्षण... मनातल्या बहुसंख्य प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत हे ठाऊक असूनही रित्या जमिनीशी संवाद साधण्याचे वेडे ऋतू..
चालता जुन्याच वाटेवरी, छाया ढळू लागल्या,
मौनातल्या कथा माझ्या, सार्या कळू लागल्या...
होते कधी रान हिरवे, पायवाटही होती सुखी,
एका अनाम क्षणी कश्या, दिशा वळू लागल्या...
फुल माझे पानही माझे, नव्हते साक्ष कुणी उद्या,
भर दुपारी चंद्र-वेड्या, वेली छळू लागल्या...
बुडता खोल आज मी, हाक न मारी तरी कुणा,
प्रवाहाला पापण्यांच्या भेटी मिळू लागल्या....
सवाल अनेक घेऊनी, पाही आकाश मोकळे,
तळहातींच्या रेषा माझ्या, मज टाळू लागल्या..
होतो उभा कधीचा, दिस मोजत पाखरांचे,
सांज-ज्योती आठवांचे थवे गिळू लागल्या....
उरता सोयरीचे काही, वेदना पळू लागल्या,
अन्
मौनातल्या कथा माझ्या, आता कळू लागल्या...
मौनातल्या कथा माझ्या, सार्या कळू लागल्या........ !!!

3 प्रतिक्रीया:
भावना (उत्तम रीतीने) पोचल्या...पण गझलेच्या वृत्तात गडबड आहे असे वाटते...जाणकारांचे मत घ्यावे...
भावनांची प्रभावी अभिव्यक्ती झाली आहे.
मौनातल्या कथांना कवितेतील शब्दांनी वाचा प्रदान केली आहे, असं म्हणावसं वाटतं.
तुम्हा दोघांचेही बरोबर आहे ... ही रूढार्थाने गझल नाहीये.. ही एक कविता आहे.. मला जशी सुचली तशी मी लिहीली... माझा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की मी एकदा लिहीले की एडीट करत नाही.. नव्हे मला परत त्याच्यात काहीच बदल करता येत नाहीत... पहिलि अभिव्यक्ती तीच खरी.. त्यामुले बरेचदा कुठल्याही निकषात ते बसत नाहीत... त्याला मी आता गझल एवजी कविता म्हणतो :)
Post a Comment